कहानी जालंधर राक्षसाची



  पार्वतीच्या सौंदर्याची स्तुती ऐकून महा शक्तिशाली जालंधर राक्षसाने पार्वतीस लग्नाची मागणी घालण्यास राहूला आपला दूत म्हणून पाठविले. राहू कैलासावर गेला आणि त्याने जालंधरासाठी पार्वतीला मागणी घातली. ते ऐकून संतापलेल्या महादेवाच्या तिसऱ्या नेत्रातून एक भीषण राक्षस निर्माण झाला. आणि राहू वर धावून गेला. त्या राक्षसाचे महाभयंकर रूप बघून राहू गर्भगळीत झाला. आणि त्याने शिवाच्या पायावर लोळणच घेतली. भोलेनाथांनी दूत बनून आलेल्या राहूला माफ केले. आणि राहूने तेथून काढता पाय घेतल्यावर महादेव परत ध्यानस्थ झाले. पण इकडे त्या भयंकर राक्षसाची भूक वाढतच होती. त्याने भोलेनाथांना विचारले, की मी काय खाऊ?


 ध्यानात मग्न होत असलेल्या महादेवांनी सांगितले "खा स्वतःलाच!"

 

 देवाधिदेव महादेवांची आज्ञा शिरसावंद्य मानून राक्षसाने स्वतःला पायापासून खायला सुरुवात केली. आणि खात खात त्याचे फक्त डोकेच उरले. तरीही त्याची भूक भागली नाही. महादेवाचे ध्यान संपल्यानंतर त्यांना दिसले ते फक्त राक्षसाचे डोके!

 

 त्या राक्षसाच्या आज्ञापालनावर भोलेनाथ प्रचंड खुश झाले. त्यांनी त्या डोक्याला नाव दिले *कीर्तीमुख*.  प्रचंड भूक असलेल्या त्या राक्षसाची भूक भागवण्याचा उपाय म्हणून देवाने त्याला येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचे पाप खाण्याचे काम दिले. या जगात कधीही न संपणारी गोष्ट म्हणजे मनुष्याचे पाप. अमर्याद अशी भूक असलेल्या कीर्ती मुखाला, देवाने काम दिले, भक्तांची पापे खाण्याचे. पंढरपूरचा विठ्ठल असो, कोल्हापूरची अंबाबाई किंवा तुळजापूरची तुळजाभवानी, या महाराष्ट्राच्या देवतांच्या मागे जी चांदीची महिरप किंवा कमान असते त्याकडे आपले लक्ष जात नाही. त्या कमानीवरच विराजमान असते हे आज्ञापालक कीर्तीमुख. अगदी देवांच्या सुद्धा वरती.

 

 दक्षिण भारतात तर शिवमंदिराच्या शिखरांवर ही कीर्ती मुखे कोरलेली असतात. येणाऱ्या शिवभक्तांची पापे गिळत असतात. जे कोणी वाईट विचार मनात घेऊन देवळात येतात, त्यांना हे कीर्ती मुख घाबरून पळवून लावते. शिवाचा मनुष्याच्या पापे करण्याच्या क्षमतेवर पुरेपूर विश्वास, त्यामुळे कीर्तीमुखाला अजूनही अगदी पोट भरून खायला मिळत आहे.



Comments

Popular posts from this blog

मुंबईच्या स्टार आणि घातक बॅट्समनला दुखापत, पलटणला मोठा झटका

डोळे येणे. डोळे आल्यास काय काळजी घ्याल?

Maharastra Kesari | पृथ्वीराज पाटील विजयी